Archive for December, 2009
जाणिवांचा सांस्कृतिक शोध…
चेतना, जाणीव, संवेदना, विचार, भावना या आणि इतरही काही गोष्टी ‘कॉन्शियसनेस ’ या संज्ञा- संकल्पनेत अनुस्यूत आहेत. त्याचप्रमाणे ‘सिव्हिलायझेशन’ या शब्दालाही अनेक छटा आहेत. बरेच वेळा ‘कल्चर’ आणि ‘सिव्हिलायझेशन’ या दोन्ही शब्दांचे भाषांतर मराठीत ‘संस्कृती’ असे केले जाते. हिंदी भाषांतरकारांनी ‘सभ्यता’ हा शब्द ‘सिव्हिलायझेशन’साठी आणि ‘संस्कृती’ हा शब्द ‘कल्चर’साठी रूढ केला आहे. पण ‘संस्कृती’ ही संज्ञा- संकल्पना अधिक व्यापक आहे.
धर्मसंस्थाही उगम पावण्याअगोदर हजारो वर्षे माणसांच्या सांस्कृतिक प्रवासाला सुरुवात झाली. परंपरा, रूढी, कुलदैवते, श्रद्धा- अंधश्रद्धा, मंत्र- तंत्र ते अगदी गणित, विज्ञान – तंत्रज्ञान हे सर्व काही संस्कृतीमध्ये असते. तंत्रज्ञानाचाही जन्म ‘विज्ञाना’च्या हजारो वर्षे अगोदरचा आहे. अलीकडे (विज्ञान आणि तंत्रज्ञान) याही दोन शब्दांचा उपयोग समानार्थी पद्धतीने केला जातो. झाडाच्या अणकुचीदार फांद्यांचा वापर करून प्राचीन माणसाने त्याचे स्वसंरक्षणासाठी आयुध
बनविले किंवा अनपेक्षितपणे गारगोटीवर दगड- गारगोटी घासून अग्नी निर्माण केला वा गडगडणाऱ्या दगडावरून पुढे गोलाकार चाक तयार करण्याची कल्पना त्याला सुचली, तेव्हाच ‘तंत्रज्ञान’ जन्माला आले, पण त्या गोष्टींमागचे ‘पदार्थविज्ञान’, कार्यकारणभाव आणि सिद्धांत वा गणित माणसाला त्या काळात माहीत नव्हते. साधे अंकगणित आणि भूमितीची काही प्रमेये ही अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीस, चीन व भारतवर्षांत ज्ञात होती. त्यासाठी अर्थात तर्कशास्त्र लागतेच.
परंतु ‘वैज्ञानिक पद्धती’ म्हणून जी मानली जाते, ती आधुनिक अर्थाने ५०० वर्षांपूर्वीची आहे. वैज्ञानिक पद्धतीत एखादा सिद्धांत मांडताना त्याचा कार्यकारणभाव, गणिती सूत्र, (शक्यतो) प्रयोगशीलता, पुन:प्रत्यय, प्रतिवाद निवारण, पर्यायी सिद्धांतांचा प्रतिवाद या व अशा गोष्टींचा समावेश आहे. ए.एन. व्हाइटहेड या विख्यात तत्त्वज्ञ-गणितीने तर म्हटले आहे की, ‘वैज्ञानिक पद्धतीचा शोध हाच सर्वात मोठा शोध आहे की ज्याच्याशिवाय ‘सिव्हिलायझेशन’ आणि ज्ञानविकास शक्यच नव्हते.’ व्हाइटहेडनेही येथे ‘सिव्हिलायझेशन’ ही संज्ञा अधिक व्यापक अर्थाने ‘सांस्कृतिकतेचा प्रवास’ म्हणून वापरली आहे.
हे ‘सिव्हिलायझेशन’ असे किती काळ सतत विकसित होत राहणार आहे? आणखी चार दिवसांनी आपण २०१० या वर्षांत प्रवेश करू. एकविसाव्या शतकातील पहिले दशक पुढील वर्षी संपेल आणि ९० वर्षांनी तर हे एकविसावे शतकच संपेल. या शतकाअखेरीची जगाची स्थिती कशी असेल? जगाची म्हणजेच लोकांची. बरोबर ४० वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या सुमारे साडेतीन अब्ज म्हणजे ३५० ते ३७० कोटी इतकी होती. आता ती सात अब्जच्या आसपास म्हणजे दुप्पट झाली आहे. आणखी ४० वर्षांनी तज्ज्ञांच्या मते जगाची लोकसंख्या कमीत कमी आठ अब्ज म्हणजे ८०० कोटी असेल. काहींच्या मते ती त्या सुमाराला स्थिरावेल, पण शतकाच्या अखेरीस १० अब्जांहून अधिक, म्हणजे एक हजार कोटींहून अधिक असेल.
लोकसंख्या वाढीचा दर कधी स्थिरावेल यासंबंधातील वाद सोडून देऊया. शतकाअखेपर्यंत जे आठ ते दहा अब्ज लोक या पृथ्वीवर असतील, त्यांचे अगदी जीवनावश्यक असे रोटी-कपडा-मकान-शिक्षण-आरोग्य हे प्रश्न सुटायचे असतील, तर अन्नधान्य उत्पादनात तिप्पट वाढ व्हावी लागेल.
परंतु ती चिन्हे दिसत नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर विदारक रूप धारण करील असे दिसते आहे. हरित क्रांतीचा जनक नॉर्मन बोरलॉग याने नोबेल पुरस्कार स्वीकारताना १९७० सालीच म्हटले होते की, लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आला नाही तर उत्पादन वाढूनही उपयोग होणार नाही. अर्थातच तसे उत्पादन वाढूनही तेव्हा उपासमार होतीच, परंतु त्याचे कारण अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील दोष. या दोषांनी गेल्या ४० वर्षांमध्ये भीषण रूप धारण केले आहे. जेव्हा अन्नधान्य उत्पादन कमी होते, तेव्हाची उपासमार समजण्यासारखी होती. आता एका बाजूला अर्धपोटी लोक आणि दुसऱ्या बाजूला ढेरपोटी माणसे- ही विषमतेची दरी अधिक स्फोटक होत जाणार असे जेफ्री सॅक्स या अर्थतज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यांच्या मते दहशतवादापेक्षा अधिक स्फोटक असे सुरुंग या जागतिक विषमतेत आहेत. कोपनहेगन येथे झालेल्या ‘क्लायमेट चेंज’ विषयावरील जागतिक परिषदेमागचा अदृश्य कॅनव्हास हा त्या नजीकच्या भयावह भविष्यचित्राचा होता.
शतकाअखेपर्यंत होत राहणाऱ्या तापमानवाढीमुळे उत्तर ध्रुव, आल्प्स पर्वतरांगा आणि हिमालय वितळतील आणि खचतील व त्यामुळे जो हाहाकार माजू शकेल, त्याला तोंड देण्याची क्षमता आजच्या जागतिक व्यवस्थेकडे नाही. वर म्हटल्याप्रमाणे तो प्रश्न आणखी काही वर्षांनी आठ ते दहा अब्ज लोकांना वेढणार आहे. ‘सिव्हिलायझेशन’ला दुसरा धोका आहे दहशतवादाचा. इस्रायल व अरब राष्ट्रे, भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान आणि अर्थातच इराण-अमेरिका (इस्रायलसह) यांच्यातील कलह वैश्विक रूप धारण करू शकतात.
म्हणूनच ‘त्रिकालवेध’मधील पूर्वीच्या एका लेखात मार्टिन रीज या ख्यातनाम वैज्ञानिकाने दिलेला इशारा उद्धृत केला होता. त्याच्या मते हे ‘सिव्हिलायझेशन’ जर योग्यरीत्या सांभाळले नाही, तर ते अखेरच्या घटिका मोजू लागेल. ‘ड४१ो्रल्लं’ ऌ४१’ या पुस्तकात त्याने दिलेला इशारा कोपनहेगनमधील मतभेदांमुळे अधोरेखित केला गेला आहे. जगातील सर्व साधनसामग्री आणि संपत्ती फक्त ४० टक्के लोकांच्या कब्जात आहे. त्यापैकी ३५ टक्क्यांहून अधिक लोक मध्यमवर्गात आहेत. उर्वरित ६० टक्के लोकांबद्दल या मध्यम व श्रीमंत वर्गातील लोकांना पर्वा नाही. म्हणजेच जगाला असलेला धोका या बेपर्वाईचा आहे. सिग्मंड फ्रॉइडने बरोबर ७० वर्षांपूर्वी, वेगळ्याच संदर्भात म्हटले होते की, या ‘सिव्हिलायझेशन’चा पाया झपाटय़ाने खचत चालला आहे. त्याने ती भीती व्यक्त केली तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे रौद्र रूप प्रगट व्हायचे होते, अण्वस्त्रांचा शोध लागायचा होता, दहशतवादाने फणा काढलेला नव्हता, वातावरण-पर्यावरणनाशातून होऊ शकणारा हाहाकार जाणवलेला नव्हता आणि लोकसंख्या वाढीचे आव्हान आलेले नव्हते. फ्रॉइडने व्यक्त केलेली भीती ही माणसाच्या मनोविश्लेषणातून त्याला जाणवलेली होती. म्हणजेच फ्रॉइडने माणसाच्या ‘कॉन्शियसनेस’चा संबंध थेट ‘सिव्हिलायझेशन’शी लावला होता. गेल्या ७० वर्षांत या ‘कॉन्शियसनेस’ संबंधात झालेल्या संशोधनाचा अंदाज फ्रॉइडला तेव्हा नसला तरी ‘सिव्हिलायझेशन’चे इमले माणसाच्या मनावर उभे आहेत आणि ते मनच इतके अस्थिर, अस्वस्थ आणि अस्ताव्यस्त झाले आहे की, सांस्कृतिकतेचे ते इमले कोसळायला वेळ लागणार नाही, असे त्याचे मत होते.
म्हणजेच माणसाच्या वैश्विक सांस्कृतिक आविष्काराचा पाया ‘मन’ नावाच्या अजून तरी अमूर्त असलेल्या गोष्टीत आहे आणि ‘सिव्हिलायझेशन’चा अभ्यास माणसाच्या ‘कॉन्शियसनेस’ संबंधातील आकलनाशिवाय पूर्ण होणार नाही. माणसाचा ‘कॉन्शियसनेस’ किंवा त्याच्या जाणिवा, त्याचे सर्जनशील चैतन्य हे इतर जीवसृष्टीपेक्षा वेगळे आहे. किंवा असेही म्हणता येईल की ते अधिक उत्क्रांत, प्रगत आणि प्रगल्भ आहे. नाही तर मुंगीलासुद्धा ‘कॉन्शियसनेस’ आहेच, जसा तो कासवालाही आहे आणि गरुडालाही; परंतु जीवसृष्टीचा अवतार झाल्यापासून त्यांच्यात झालेले सर्व बदल मुख्यत: चार्ल्स डार्विनने विशद केलेल्या उत्क्रांती ‘नियमा’नुसार झाले आहेत, परंतु माणसाने त्या जैविक-शारीरिक-नैसर्गिक मर्यादा ओलांडून आपली समांतर सृष्टी निर्माण केली आहे. ही विश्वनिर्मिती खरोखरच परमेश्वराने निर्माण केलेली असेल तर तोही माणसाच्या या अचाट समांतर सृष्टीकडे पाहून थक्क झाला असता. (परंतु ‘परमेश्वर’ ही संकल्पनाच मानवनिर्मित असल्यामुळे याबद्दलची सर्व चर्चा आणि वाद तेथेच गोल-गोल फिरत राहतात.) फ्रीमन डायसन या वैज्ञानिकाने एका निबंधात म्हटले होते की, नास्तिक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारातले नास्तिक हे देवाचे अस्तित्वच मानत नसल्यामुळे ते त्याबद्दलच्या वादातच पडत नाहीत आणि विश्वाचे, जीवसृष्टीचे, मानवी मनाचे गूढ आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने शोधत राहतात. असे नास्तिक मग श्रद्धाळू लोकांची टिंगलही करीत नाहीत आणि त्यांना गांभीर्यानेही घेत नाहीत. दुसऱ्या प्रकारातले नास्तिक ‘परमेश्वर नाही’ हे सिद्ध करण्यासाठी इतक्या अहमहमिकेने उतरतात की ते जणू थेट परमेश्वरालाच वादात उतरवून त्याला खोटे पाडण्याचा प्रयत्न करतात.
तो वाद बाजूला ठेवूया. डॅनिएल डेनेट (‘द ओरिजिन्स ऑफ कॉन्शियसनेस’चा लेखक) या वैज्ञानिक विचारवंताने म्हटले आहे की परमेश्वराच्या संकल्पनेचा (अस्तित्वाचा!) उदय हाही माणसाच्या मानसिक/वैचारिक उत्क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा आहे. जीवसृष्टीतील कुणालाही- मुंगी असो वा हत्ती- देवाच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न पडत नाहीत. आपण येथे कसे ‘जन्माला’ आलो याबद्दलचे कुतूहल प्राण्यांना वाटत नाही, अचेतन दगड आणि आपण यात काही फरक आहे हे जीवसृष्टीतील इतर जिवांना कळत नाही आणि या विश्वाचे गूढ उकलवावे अशी जिज्ञासा त्या जिवांच्या ‘कॉन्शियसनेस’मध्ये निर्माण होत नाही. माणसाच्या जिज्ञासेतूनच ‘सिव्हिलायझेशन’ची सुरुवात झाली आणि त्याच जिज्ञासेतूनच आलेले एक ‘हायपोथिसिस’ ऊर्फ संभाव्य तर्कअंदाज म्हणजे परमेश्वराची संकल्पना!
त्याच जिज्ञासेतून आणि (अजूनही न उलगडलेल्या मनाच्या) सर्जनशीलतेतून जन्माला आले संगीत, चित्रकला, साहित्य, नाटक, चित्रपट, विज्ञान, तंत्रज्ञान- ज्यांच्या आधारे माणसाने त्या (परमेश्वरी!) सृष्टीतच बदल करायला सुरुवात केली. त्या बदलांमुळे माणसाला ‘निर्मितीचा आनंद’ (म्हणजे नक्की काय यावर संशोधन चालू आहे!) मिळाला, पण विध्वंसाचे साधनही मिळाले. अणुविभाजनाच्या संशोधनामुळे ऊर्जाही मिळाली आणि अणुबॉम्बही! विशेष म्हणजे त्या व इतर वैज्ञानिक संशोधनांमुळे कलेचे क्षेत्रही प्रचंड प्रमाणावर विकसित झाले. विज्ञान हीच एक कला आहे असे वैज्ञानिक म्हणू लागले आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांमधील रसायने, धातू, पदार्थ घेऊन प्रचंड आकाराच्या ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चा जन्म झाला. या ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ आविष्काराचा जन्म होण्यापूर्वी अजंठा, वेरूळ, कुतुबमिनार, ताजमहाल, आयफेल टावर अशी महान ‘इन्स्टॉलेशन्स’ पूर्वीच्या कलाकारांनी विज्ञान व गणिताची मदत घेऊन उभी केली होती. केनेथ क्लार्क या कला व इतिहास संशोधकाने बीबीसीवर एक चित्तवेधक मालिका सादर केली होती. तिचे नाव होते ‘सिव्हिलायझेशन’. ही मालिका मुख्यत: पाश्चिमात्य सांस्कृतिकतेच्या प्रदीर्घ प्रवासावर आणि कलासंस्कृती आविष्कारावर ऐतिहासिक व कलात्मक प्रकाशझोत टाकणारी होती. या सर्व कला व विज्ञानाचा, सर्जनशीलतेचा प्रेरणास्रोत काय होता याचे उत्तर क्लार्क यांच्याकडेही नव्हते- पण परमेश्वराची हजेरी मात्र जागोजागी होती!
म्हणजेच Consciousness, Creativity and Civilization — जाणिवा, सर्जनशीलता आणि संस्कृती यांचा शोध एकत्रितपणेच घ्यावा लागणार. असेही म्हणता येईल की खऱ्या अर्थाने इतिहास म्हणजे या प्रेरणास्रोतांचा शोध; परंतु मानवी इतिहास घडविला आहे तो संघर्षांनी, युद्धांनी, हिंसाकांडांनी. म्हणूनच केनेथ क्लार्क यांना त्यांच्या ‘बीबीसी’ मालिकेत त्या ‘असंस्कृत’ गोष्टींचाही आढावा घ्यावा लागला. त्यातूनच त्यांना आणि आजपर्यंतच्या सर्व संशोधकांना पुन्हा माणसाच्या मनाकडे आणि सामूहिक अंतर्मनाकडे वळावे लागले. किंबहुना असेही म्हणता येईल की १८४५ ते १८८५ या ४० वर्षांच्या काळात जेवढे मूलभूत चिंतन माणसाच्या अत:प्रेरणांबद्दल मार्क्स, एंजल्स, डार्विन, फ्रॉइड यांनी केले तेवढे खरे म्हणजे, त्यानंतर झालेले नाही. आजही त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी का होईना, पण त्यांचाच आधार घ्यावा लागतो. कार्ल मार्क्सने मानवी प्रेरणांचा शोध माणसाच्या उत्पादन शक्तीत, उत्पादन संबंधात आणि उत्पादन तंत्रांमध्ये घेतला. जर सर्व नैसर्गिक आणि मानवनिर्मित वर्गविद्रोहाच्या अडचणींवर मात करता आली तर सुखी, समाधानी व सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल, असे मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांना वाटले.
चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतानाच ‘The Descent of Man’या प्रबंधातून माणसाच्या जाणिवा, प्रेरणा, पर्याय निवड करताना होणारी त्याची घालमेल व त्यातून घडत जाणारे मन व स्वभाववैशिष्टय़े यांचा शोध घेतला. सिग्मंड फ्रॉइडने मनाचा, अंतर्मनाचा आणि अंतर्मनाच्या गाभाऱ्यात शिरून तेथील गूढाचा पडदा दूर करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नांनाच समांतर सुरू होते पदार्थविज्ञानशास्त्रातील प्रयोग, खगोलशास्त्रीय वेध आणि विश्वनिर्मितीचे रहस्य भेदण्याचे प्रयत्न. परंतु या सर्वापेक्षा अर्थातच महत्त्वाची होती ती माणसाला झालेली स्वत:बद्दलची, विश्वाबद्दलची, जीवसृष्टीबद्दलची जाणीव. जन्म-मृत्यूचे भान आणि अर्थातच स्वत:च्या ‘कॉन्शियसनेस’चे झालेले ज्ञान.
हा शोध अखंड चालूच राहणार आहे.
कुमार केतकर
त्रिकालवेध
गेले एक वर्ष ‘त्रिकालवेध’ या सदरामधून मानवी संस्कृतीचा, जाणिवांच्या उत्क्रांतीचा, त्या अनुषंगाने माणसाच्या स्वभाववैविध्यांचा आणि विज्ञान- तंत्रज्ञानाने घडवून आणलेल्या अद्भुत क्रांतीचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला होता. स्तंभाच्या शब्दमर्यादेत हे अथांग ज्ञानविश्व आवाक्यात घेणे अर्थातच शक्य नाही, परंतु ज्ञानक्षितिजाच्या सीमांवर सुरू असलेल्या चिंतनाची ओळख करून देणे इतकाच या स्तंभाचा हेतू होता. या निमित्ताने या विषयासंबंधातील होत असलेले संशोधन, प्रसिद्ध होणारे ग्रंथ वा जगभरच्या तत्त्वज्ञ-वैज्ञानिक म्हणजे अर्वाचीन ऋषी-मुनींनी केलेले विचारमंथन काही प्रमाणात मी वाचकांसमोर ठेवू शकलो. अजूनही हा स्तंभ मी चालू ठेवावा असा वाचकांचा आग्रह असला तरी या स्वरूपात येत असलेली ही लेखमाला मी स्थगित करीत आहे. वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
साभार – लोकसत्ता
साद प्रवाही जीवनाची ! विजय मुडशिंगीकर

विजय मुडशिंगीकर
नदीत फेकलेल्या मृतदेहांमुळे जलजीवसृष्टी नष्ट होतेय, पाणी प्रदूषित होतंय.. सारं समजतंय, पण डोळ्यांवर झापडं बांधून जगणा-यांना त्याचं काहीही वाटत नाही. सरकारी प्रयत्न त्यांच्या मर्यादेत होताहेत, पण लोकांचं काय? त्यांनी जागृत व्हायला हवं.
शारीरिक आणि आर्थिक संकटातून तरलो आणि गंगेच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला सज्ज झालो. दिल्लीच्या ललित कला अकादमीत निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं. त्यासाठी नोकरी सोडली. प्रॉव्हिडंट फंडातून घेतलेल्या पैशांतून हे प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याच शिदोरीवर माझा पुढचा प्रवास सुरू झाला. मला कोल्हापूरची पंचगंगा नदी आठवत होती. तिच्या काठावर बालपण गेलं होतं माझं, तिच्या प्रवाहात किती वेळ डुंबलो होतो मी. सारं आठवत राहिलं. तेव्हा पाठ केलेली ‘गंगेची प्रार्थना’ माझ्या अजूनही स्मरणात आहे. मोठेपणी याच गंगेच्या ओढीनं मी प्रवाहत राहीन, असं कधी वाटलं नव्हतं. पण ‘सारे तीरथ बार-बार, गंगासागर एकबार’ या म्हणीप्रमाणे गंगेच्या सान्निध्यात मी गेलो आणि तिचाच झालो. कोलकाता असो की पाटणा, गया असो की प्रयाग, पंढरीच्या वारीप्रमाणे माझ्या वा-या सुरू झाल्या. एका वारीहून परतत होतो, दुसरीला जाण्यासाठी. या प्रवासात मला गंगेचं पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक महत्त्व कळलं, माणसं कळली. तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते भेटले तसेच उदासीनतेनं पछाडलेलेही दिसले. गंगेच्या प्रवाहात वाहणारा मृतदेह पकडण्यासाठी धडपडणारा कुत्रा पाहिला आणि त्याच नदीवरील एका पुलावर एका डॉक्टरनं लिहिलेला ‘गंगामें पाप धोये, न की गंदगी’ हा बोर्डही पाहिला. अशा परस्परविरोधी प्रकारांनी मन सुन्न होत होतं. पण त्यातूनच पुढे जायला प्रेरणाही मिळत होती. ‘माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी’ ही पंडित नेहरूंची अखेरची इच्छा आठवली. समाजमन, पाणी, हवा सगळं प्रदूषित होत आहे. अशावेळी पं. नेहरूंसारखी इच्छा व्यक्त करणारेही राहिले नाहीत. तुम्हाला ‘गंगाजल’ सिनेमा आठवतोय? गंगेच्या काठावर अनेक संस्कृती उदयाला आल्यात, त्यात संपन्नतेबरोबरच बळजबरी आणि गुंडगिरी यांचीही संस्कृती जन्माला आली आहे. त्या चित्रपटात या विकृत संस्कृतीवर प्रकाशझोत टाकला आहे. गंगेच्या प्रदूषणाबरोबरच सामाजिक प्रदूषणही रोखलं गेलं पाहिजे. ‘गंगा अॅक्शन प्लॅन’ राबवताना केंद्र सरकारने याही गोष्टींचा विचार करायला हवा. लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा बाजारही रोखला गेला पाहिजे. आधुनिक युगात गंगा नदीच्या पावित्र्याचा ‘धंदा’ करताना भ्रष्टाचारी लोकांना काहीही वाटत नाही. सर्वसामान्यांना कसंही नाडलं जातं. भाविकांकडून पैसे उकळणारे आणि स्वार्थासाठी कुठल्याही पातळीवर उतरलेले मी गंगाकिनारी पाहिलेत. ‘राम तेरी गंगा मैली’चं टायटल साँग तुम्हाला आठवत असेल ना? त्यातील विदारकता मी जवळून पाहिलीय. नदीत फेकलेल्या मृतदेहांमुळे जलजीवसृष्टी नष्ट होतेय, पाणी प्रदूषित होतंय.. सारं समजतंय, पण डोळ्यांवर झापडं बांधून जगणा-यांना त्याचं काहीही वाटत नाही. सरकारी प्रयत्न त्यांच्या मर्यादेत होताहेत, पण लोकांचं काय? त्यांनी जागृत व्हायला हवं. पर्यावरणाचा -हास थांबवण्यासाठी शेकडो हात पुढे येताहेत. त्यांना साथ द्यायला हवी. गंगेसारख्या अनेक नद्या आहेत भारतात. त्यांचीही गत गंगेसारखी होऊ नये म्हणून आजच प्रयत्न सुरू करायला हवेत. येणा-या पिढीला स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी मिळायला हवं असेल, तर जलशुद्धीकरण प्रकल्पांना चालना मिळाली पाहिजे. पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाणी म्हणजे जीवन, असं आपण सहजगत्या म्हणतो. पण त्यातील गांभीर्य आपल्याला कळतं का? आपल्या देशाचं हेच दुर्दैव आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, ब्रह्मपुत्रा, पंचगंगा, मिठी.. सा-याच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पापं धुण्याऐवजी पापं करतच चाललोय आपण. आता तरी शहाणे होऊया. जल संवर्धनाच्या अभियानात सहभागी होऊयात. ‘दिल से’ सदराचा निरोप घेताना या प्रवाही जीवनाची साद घालतोय तुम्हाला. साथ देणार ना?
साभार- प्रहार

गंगामृत की प्रदूषित पाणी ? विजय मुडशिंगीकर

विजय मुडशिंगीकर
कित्येक वर्ष आपणच कोटी कोटी घाव घालून तिला घायाळ करून टाकलंय. तिला हीन-दीन-क्षीण करून टाकलंय. तिला धरणात अडकवलं, रासायनिक प्रदूषणानं भ्रष्ट केलं. इतके आघात सोसूनही ती मात्र आपल्या धर्माला जागतेय. गंगेच्या कोट्यवधी पुत्रांनी तिची कितीही अवहेलना केली तर ती मात्र कर्तव्याला चुकलेली नाही. आपलं काम ती तितक्याच नेटानं करतेय.
कोट्यवधी भारतीयांना प्रेम आणि श्रद्धा या धाग्यात बांधणारी गंगा नदी. तिच्याकाठी वसली आहे कित्येक शतकांची, युगांची संस्कृती. युगानुयुगं ही गंगामैया तिच्या पुत्रांना पोसते आहे, त्यांच्यावर माया करते आहे. गंगाजलास भारतीय संस्कृतीनं अमृत मानलं आहे. हजारो वर्षांचा तिचा प्रवास आहे. पण आता मात्र ती थकलीय. तिचा अंत करायला आपणच टपलोय. कित्येक वर्ष आपणच कोटी कोटी घाव घालून तिला घायाळ करून टाकलंय. तिला हीन-दीन-क्षीण करून टाकलंय. तिला धरणात अडकवलं, रासायनिक प्रदूषणानं भ्रष्ट केलं. इतके आघात सोसूनही ती मात्र आपल्या धर्माला जागतेय. गंगेच्या कोट्यवधी पुत्रांनी तिची कितीही अवहेलना केली तर ती मात्र कर्तव्याला चुकलेली नाही. आपलं काम ती तितक्याच नेटानं करतेय. ती थकली असली तरी थांबलेली नाही. तिचा हा अविरत प्रवाह कधीही थांबू नये हीच माझी मनोकामना आहे. मी तिच्या वात्सल्यानं भारावलो आहेच, तिच्यावरील आक्रमणानं हताशही झालोय. पण माझा प्रयत्न मी आता थांबवणार नाही. ‘गंगाजल शुद्धीकरण’ असो की ‘गंगा नदी बचाव मोहीम’, मी आणि माझा कॅमेरा, आपल्या परीनं काम करतोय. इथं सर्वानाच मोक्ष हवाय, सगळ्यांनाच पापं धुवायची घाई लागलीय. लोकांना पापमुक्त करण्यासाठी हीच गंगामाता राम-कृष्णाच्याही आधीपासून वाहतेय. मग तिचं अमृततुल्य पाणी पिताना ते स्वच्छ नको का? घाणमिश्रीत पाणी आचमन करताना आपल्याला ते जाणवत नाही का? उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल.. जिथं जिथं म्हणून गंगा वस्त्यांच्या संपर्कात आली तिथं तिथं दिसतं ते प्रचंड प्रदूषण आणि कचरा. गंगामैया, गंगादेवी, गंगाजी म्हणत आपण तिला प्रदूषणाच्याच खाईत लोटत आहोत. मला गंगा नदी भावली ती तिच्या सौंदर्यासाठी. पण जसजसा मी फोटो काढत गेलो आणि अभ्यास करत गेलो, तसतसं अधिकाधिक हादरत गेलो. सौंदर्यापेक्षा या नदीला असणारा दु:खाचा काठ मला विशेष जाणवला. ‘बघ किती घाण माझ्या पात्रात साचलीय ते,’ असं म्हणत गंगामाईनंच कोलकात्याला बेल्लूर मठाच्या पाठीमागे काळंभोर झालेलं गंगाजल दाखवलं. त्या वेळी गोमुखला पाहिलेलं निळंशार गंगाजल आठवलं मला. निसर्गाचा चमत्कार पाहून माझ्या डोळ्यातल्या गंगेला महापूर आला होता तेव्हा. पण कोलकात्याचं भीषण पाणी पाहिलं आणि गंगेच्या अवहेलनेनं अक्षरश: रडलो. -हास करणारे कोणी गंगेचे शत्रू नव्हते. सारेच तिचे भक्त. पण जाणते-अजाणतेपणी मोक्षप्राप्तीच्या आंधळ्या कोशिंबिरीत हे भक्तच देवाची अवहेलना करत होते. प्रेतं, जनावरांची कलेवरं, स्मशान घाटावरली राख, हाडं, सांडपाणी, मलमूत्र, रसायनं.. पवित्र मानल्या गेलेल्या गंगेच्या काळजावर अशा विटंबनांचे घाव रोजच्या रोज वाढत चाललेत. या सर्वांना आवरणारा श्रीकृष्ण कुठंच दिसत नाही, दु:ख त्याचंच होतंय. गेली सहा वर्ष मी गंगामय झालोय. कितीदा गंगोत्री, गोमुख, प्रयाग, काशी फिरलोय. हरिद्वारची कावडयात्रा, अलाहाबादचा कुंभमेळा, वाराणशीची देवदिवाळी, पाटण्याची छटपूजा, कोलकात्याचा दुर्गा उत्सव आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटावरील मकर संक्रांतीची गंगासागर यात्रा. सगळीकडं तिची पूजा होताना पाहिली. तिचं पाणी श्रद्धेनं गंगाजल म्हणून प्राशन करणारे कोट्यवधी भाविक त्याच पाण्यात बिनदिक्कत घाणही करताना आढळले. पर्यावरणप्रेमी, देशी-परदेशी जल शास्त्रज्ञ, विश्व प्रकृती निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ), संकटमोचन फाऊंडेशनसारख्या पर्यावरणवादी संस्था धोक्याचे इशारे देऊन थकल्या. देवदिवाळीचे आकाशकंदीलही धोक्याचा लालबावटा दाखवत असावेत, असं वाटायला लागलंय. तरीदेखील गंगानदीच्या प्रदूषणाला रोखणं अवघड झालंय. पण अशक्य नाही, एवढं नक्की. प्रयत्न सुरू आहेत. यशापयश प्रयत्नांवर आणि काळावर अवलंबून आहे, तसंच गंगाकिना-यांवरील लोकांच्या सहभागावरही अवलंबून आहे.

साभार – प्रहार
http://www.prahaar.in/dil_se/17410.html
Marathi Online News
पंचगंगा ते गंगा ! विजय मुडशिंगीकर

विजय मुडशिंगीकर
२००१ ते २००६ या कालावधीत गोमुख उगमापासून गंगासागपर्यंत गंगेच्या खो-यात फिरून आलेल्या अनुभवांचं संकलन म्हणजेच ‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक. माझे मित्र आणि पर्यावरणप्रेमी नरेंद्र प्रभू यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलंय. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.
मी मूळचा कोल्हापूरचा, करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी हे माझं जन्मगाव. पण माझं आजोळ वळीवडे हे पंचगंगेच्या काठावर वसलेलं. बालपण आजोळीच गेलेलं. त्यामुळे मनात खोलवर कुठे तरी ‘पंचगंगा’ आणि ‘गंगा’ वाहत आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षीच म्हणजे इयत्ता नववीत असताना घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मुंबईत क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीत कामाला लागलो. पुढे रात्रशाळेतून दहावीची परीक्षा दिली. तीनही पाळ्यांमध्ये काम करावं लागायचं. इच्छा असूनही शिक्षणाची आवड मात्र पूर्ण करता आली नाही. पण वाचनाची आवड मात्र जोपासता आली. या छंदातूनच मी दोनदा जिवावरच्या दुखण्यातून वाचलो. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण माझ्या बाबतीत शब्दश: खरी ठरली.
याच काळात छायाचित्रणाचीही आवड निर्माण झाली आणि त्याचं रूपांतर छंदात कधी झालं कळलंच नाही. घरगुती समारंभांपासून ते थेट निसर्गाच्या सान्निध्यात भटकून फोटोग्राफी करता आली. कुठलंही तांत्रिक शिक्षण नाही, कोणीही शिकवलं नाही, अशा परिस्थितीत मी एकलव्याच्या चिकाटीनं ही कला आत्मसात केली. आज गंगेचा प्रवाह उभा-आडवा फिरताना, तिथला परिसर कॅमे-यात बद्ध करताना मला या कलेचा आणि चिकाटीचा नक्कीच लाभ झाला. १९९८मध्ये पाठदुखीच्या व्याधीमुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट व्हावं लागलं होतं. तिथं निसर्ग लेखक सुरेशचंद्र वारघडे यांचं ‘हिमयात्री’ पुस्तक वाचलं. त्यातला ‘भगिरथ तेरी गंगा मैली’ हा लघुलेख वाचला आणि मी अंतर्मुख झालो. त्यात गंगा नदीच्या प्रदूषणाची व्यथा मोठ्या आर्तपणे मांडली होती. ती वाचून आंतर्बाह्य हादरलो. गंगा नदी माझ्या मनात ठसली ती तेव्हाच. स्लीपडिस्कमुळं जवळपास अपंगावस्थेतच होतो मी. पण डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी केलेल्या उपचारामुळे मी चालू-फिरू लागलो. त्यांच्यामुळेच आज मी माझ्या पायांवर उभा आहे. २००१ ते २००६ या कालावधीत गोमुख उगमापासून गंगासागपर्यंत गंगेच्या खो-यात फिरून वेगवेगळ्या ऋतूंमधील गंगानदीच्या निसर्गसौंदर्यापासून ते तिच्या काठच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा आणि वाढत्या प्रदूषणामुळे घाण झालेल्या नदीचा वेध घेतला. हा प्रवास म्हणजे अनुभवांची खाण होती. या अनुभवांचा परिपाक म्हणजेच माझं ‘गंगाजल’ हे छायाचित्रांचं प्रदर्शन. या दरम्यान आलेल्या अनुभवांचं संकलन म्हणजेच ‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक. माझे मित्र आणि पर्यावरणप्रेमी नरेंद्र प्रभू यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलंय. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत माझे विचार मांडलेत. ‘पंचगंगा’ नदीच्या काठचा मी, आज ‘गंगा’ नदीच्या ओढीनं कसा प्रवाहत गेलो, तेही सांगितलंय. भूमिका स्पष्ट करताना अनेक गोष्टींचा ऊहापोह केला आहे त्यात. कारण गंगाजल प्रदर्शन, निसर्ग, पर्यावरण, प्रबोधन, सामाजिक बांधिलकी, छायाचित्रकला, सर्वसामान्यांपर्यंत गंगा नदीचं आणि पाण्याचं महत्त्व, त्यासाठी राबवलेले उपक्रम.. अशा सा-या संकल्पनांचं शब्दरूपी संकलन होणं मला गरजेचं वाटत होतं. खरं तर मी मितभाषी. माझा ‘बोलण्यापेक्षा करण्यावर’ अधिक विश्वास आहे. लेखन हा माझा प्रांत नाही. पण नरेंद्र प्रभू यांच्यासारखे सुहृद मला लाभले आणि जे केलं ते सुसंवादातून व्यक्त करता आलं. माझ्या कामातून जर कोणाला निसर्ग संवर्धनाचं वेड लागलं तर आनंदच होईल. माझा चांगुलपणावर आणि माणसातील माणुसकीवर अतोनात विश्वास आहे. फक्त त्यांच्यात मानवतावादी दृष्टिकोन झिरपता ठेवता आला पाहिजे, एवढंच. गंगाकाठचा माझा प्रवास कधी संपणारा नाही. अखंड भारतवर्षाला एकतेच्या एका समान धाग्यात बांधणारी गंगा आपल्याला आर्त साद घालते आहे. तिला प्रत्येकानं मनापासून प्रतिसाद द्यावा, इतकीच अपेक्षा!

साभार- प्रभार
प्रश्न सर्वच जीवनसरितांचा- विजय मुडशिंगीकर
नद्या स्वच्छ व्हायला हव्यात, त्यांच्या किना-यावरील अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं थांबायला हवीत आणि नद्यांच्या पाण्याचा प्रवाह सतत वाहता राहिला पाहिजे. या भूमिकेतून नद्यांच्या संवर्धनासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, पर्यावरणप्रेमी, जलप्रेमी, निसर्गप्रेमी, संस्था, युवावर्ग सा-यांना एकत्र आणलं जाईल.

विजय मुडशिंगीकर
गंगा ही राष्ट्रीय नदी आहे. सरकारने ‘गंगा अॅक्शन प्लॅन’ राबवला असला तरी तो पूर्णत: यशस्वी व्हायचा आहे. जी गत गंगेची, तीच महाराष्ट्रातील नद्यांची. राज्यातील प्रत्येक नदीबाबतही ‘अॅक्शन प्लॅन’ राबवायला हवा. मुख्य म्हणजे सरकारी मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येक छोट्या-मोठ्या नदीकाठी वसलेल्या जनतेनंही पिण्याचा पाण्यासाठी या जीवनसरितांना महत्त्व दिलं पाहिजे. गोदावरी असो की मिठी किंवा उल्हास नदी.. प्रदूषणाचा प्रश्न गहन आहे. मुंबईतील महापुरानंतर ‘मिठी’ नावाची नदी आहे, हे लोकांना कळलं. या नद्या स्वच्छ व्हायला हव्यात, त्यांच्या किना-यावरील अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं थांबायला हवीत आणि नद्यांच्या पाण्याचा प्रवाह सतत वाहता राहिला पाहिजे. या भूमिकेतून नद्यांच्या संवर्धनासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, पर्यावरणप्रेमी, जलप्रेमी, निसर्गप्रेमी, संस्था, युवावर्ग सा-यांना एकत्र आणलं जाईल.
गंगाजल फाऊंडेशनने ‘जन जोडो अभियान’ उपक्रमाची तयारी सुरू केली आहे. यात उत्तराखंड ते पश्चिम बंगाल प्रवासात एक कोटी लोकांशी संवाद साधला जाणार आहे. गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसंच गंगेतील जैवविविधतेचं संरक्षण-संवर्धन व्हावं, यासाठी कित्येक वर्ष विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र स्थानिकांच्या सहभागाअभावी त्या अपयशी ठरत आहेत. गंगेचं पावित्र्य अबाधित राखायचं असेल तर स्थानिकांचा सहभागही तितकाच अपेक्षित आणि महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ गंगोत्रीपासून गंगासागपर्यंतच्या म्हणजेच उत्तराखंड ते पश्चिम बंगाल या भागात ‘जन जोडो गंगायात्रा’ अभियान राबवणार आहे. गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘गंगा अॅक्शन प्लॅन’ राबवण्यात आलाय. पण ज्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते आहे, त्या लोकांचाच अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना अपयशी ठरली. त्यानंतर केंद्र सरकारने गंगेला ‘राष्ट्रीय नदी’चा दर्जा बहाल केला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. ही समिती गंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांवर लक्ष ठेवणार आहे. मात्र याबाबतही स्थानिकांनी अनुत्साह दाखवल्यास केंद्र सरकारच्या माथी पुन्हा अपयशच येणार असल्याने ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ संस्थेने गंगेकाठी राहणा-या रहिवाशांमध्ये जनजागृती करणारे ‘जन जोडो गंगायात्रा’ अभियान हाती घेतलंय. या अभियानात आमच्यासोबत डॉ. राजेंद्र सिंह, बीबीसी वृत्तवाहिनीचे लघुपट निर्माते ज्युलियन हॉलिक, वीरभद्र मिश्रा, कल्याण रूद्र आदी अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ सहभागी होतील. ही मंडळी हरिद्वार ते कोलकात्यापर्यंतचा प्रवास बोटीने करून गंगेकाठी वसलेल्या गाव-शहरांवर होणा-या प्रदूषणाच्या परिणामांवर अभ्यास करतील. अभ्यासांतर्गत तयार करण्यात आलेला अहवाल अभियानाच्या अंतिम टप्प्यात केंद्र सरकारकडे सादर केला जाईल. ‘राऊंड द अर्थ सायकलिंग फाऊंडेशन’चाही या अभियानात सहभागी असेल. अभियानांतर्गत गंगेचं इतिवृत्त १२० छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं जाईल. गंगोत्रीपासून गंगासागपर्यंतच्या प्रत्येक गावात, शहरात हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलं जाईल. तसंच माहितीपट, व्याख्यानं, पथनाट्यांच्या माध्यमातूनही गंगेच्या प्रदूषणाबाबत गावागावांत जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

साभार- दिल से, प्रहार
gangajal blog
